आठवणींचा ज्युकबॉक्स

आपल्याला आवडणारी सगळी गाणी ही अलिकडच्या काळातील किती असतात .. फारच कमी.. पण चालू दशकातील किंवा गेल्या दशकातील म्हटलं तर.. ती मात्र पटापट सांगता येतील. स्मृतींच्या पडद्याआड अलगद कापसात गुंडाळून एखादी नाजूक गोष्ट ठेवलेली असावी, तशी त्या गीतांच्या आठवणी आपण जपलेल्या असतात. अन, म्हणूनच आपल्याला त्या विषयाला सुरूवात झाल्या झाल्या क्षणाचही विलंब न होता सांगता येतात. काल-परवा कुठे कुठे फिरून आलो हे सांगायला आपल्याला थोडा विचार करावा लागतो. पण, कुठे मुशाफिरी करायला गेलो होतो, भटकायला बाहेर पडलो होतो, हे मात्र आपण लगेच बोलायला लागतो. तिथे घालवलेल्या क्षणांचा आपल्याला किंचितही विसर पडलेला नसतो. ही आपल्या मेंदुची सगळ्यांनाच आवडणारी अत्यंत खास सवय, किमया असावी यावर कुणाचेच दुमत नसेल.

ज्याप्रमाणे आपल्याला आवडत्या गाण्यांचा ज्युकबॉक्स आपल्याला तयार करून ठेवता येतो. तशीच यंत्रणा मेंदुच्या एका भागात कार्यरत असते. स्मृतीकोषाचे काम करण्यासाठी मेंदुत बऱ्याच यंत्रणा काम करत असतात. हे खरंतर मेंदुचे शरिर, मनावर मोठे उपकारच आहेत. निसर्गाने मानवाला बहाल केलेली ही दिव्य क्षमताच म्हणता येईल. कोणत्याही उदासीन होण्याच्या वेळी आपण या आठवणींना पुन्हा आपल्या विचार प्रक्रियेत आणून काही काळासाठी का होईना पण आनंदी होऊन जातो. यातून एक हर्षाची भावना आपल्या सर्वांगाला स्पर्शुन जाते. त्यामुळे थोडासा धक्काधुक्कीतून दिलासा मिळतो. अन, पुन्हा एकदा नव्याने कार्यमग्न होण्यासाठी उर्जा लाभते. प्रफुल्लित करणारी प्रसन्नता मिळाल्याचा नक्कीच चांगले कर्म करण्यासाठी उपयोग होतो.

केव्हा केव्हा असे होते की पटापट आयुष्य बदलत जाते. अनेक गोष्टी वळणे घेऊ लागतात. सध्या जिथे आहोत तिथून दूर कुठेतरी लांब निघून जातो. कळत नाही ते ही, इतक्या वेगात सगळंच चित्र पालटलेलं असते. आपल्या राहण्याचे असेल, कामाचे असेल, आयुष्यातून निघून गेलेल्या, विसरलेल्या माणसांचे पुन्हा आयुष्यात येण्याचे असेल अनेक प्रकारे आपले आयुष्य बदलते. अन, ह्या क्षणी पण आपला आठवणींचा ज्युकबॉक्सचा खेळ मेंदूच्या विचार पटावर सुरू होतो. बरं. यावेळी एखादं चार-पाच मिनिटाचे गाणे नसते. चांगला चार-पाच तासांचा सिनेमा असू शकतो. एखादा रेल्वेच्या दरवाजात उभा राहून वा बसून केलेला प्रवास असू शकतो. एखाद्या व्यक्तीसोबत जाण्याची केलेली अनाठायी धडपड असू शकते, कुण्या भलत्या-सलत्यासाठी आपल्या जवळच्या लोकांची ओढावून घेतलेली नाराजीही यातच आली. अर्थात, चांगलेही सिनेमे असतातच की, ज्यांना चांगले अनुभव असे आपण म्हणतो. सुखद आठवणी, सिनेमे पापणी झपकायच्या आतच संपतात म्हणा, पण. दुखाची सल मात्र अनेक वर्षे सलत जाते. प्रत्येक व्यक्तीकडे अशा प्रकारचे ज्युकबॉक्स असतात. कालांतराने जेव्हा आपण त्यांना आठवतो तेव्हा कमी-अधिक प्रमाणात आपल्याला सुख, दुःख दोन्ही वाटते. कधी सध्याच्या परिस्थितीवर हायसे वाटते, कधी विषण्णता वाटते. पण, यावेळा रूक्ष आयुष्याला पुन्हा हिरव्या तांडव्याने बहरून टाकणाऱ्या असतात. मनाला मोकळं करणाऱ्या ठरतात. क्षणभर थबकवून नंतर मात्र आपली चाल झपझप करून टाकणारी असतात. हा ज्युकबॉक्सचा कोपरा अचानक हळवा करून टाकणारा असतो.

मोकळी वेळ कधी आपल्याला येवून मिळेल हे सांगता येणे कठीण. पण, कधीतरी असे होतेच. सामान्य माणसांचे आयुष्य पळापळीचे आयुष्य जगताना असा कधीसा मोकळा वेळ आपल्याला सहज सापडून जातो. अन तेव्हा आपण आवडीचे सिनेमे पाहण्यास प्राधान्य देतो. ही आपली खूप आवडीची वेळ बनून जाते. हवीहवीशी वाटून जाते. सिनेमात आपल्याला भावणारे कलाकार-पात्र असतात, ती प्रसंग आपल्या जवळची असतात. आपल्या आयुष्यातील महत्वाच्या व्यक्ती अन घटनांचा यात समावेश होतो. तेव्हा ते अगदी रममाण होऊन जाणाऱ्या घटनांनी नटलेलं स्वप्न संपू नयेच असे वाटते. बऱ्याच वेळ रेंगाळून जाण्याइतपत आपल्या आयुष्यात त्या आठवणींना महत्व असते. हे इतकं की आपण ठरवून आपल्याला हवा तितका वेळ घेत, रिवाइंड, करून हा सिनेमा पाहत जातो. हे सगळं विलक्षणच सुंदर..

हे सगळं आपल्याला का .. हे माणसांना कधी शाप, वरदान वाटणारे आठवणींचे गाठोडे आयुष्याच्या पाठीवर का. याचे उत्तर त्या निसर्गालाच माहिती आहेत. पण, या सगळ्या गोष्टी ज्या आपल्याला हव्याशा,नकोशा आहेत त्यांना स्मृतीत राखण्याचे वा टाळता न येण्याचेच आयुष्य आपल्याला लाभलंय. त्यातून आपण थोडं जगायचं, शिकायचं. याचे कारण म्हणजे ईतिहास, भूतकाळ नेहमीच वर्तमानाला धडे देत असतो. ज्यांना गिरवून भविष्यातील सुवर्णक्षणांना मिळवता यावे यासाठी माणसांना जगण्याचे नियम ठरवता येतात. अन, यासाठीच हा ज्युकबॉक्स पुन्हा पुन्हा आपण आयुष्यात प्ले करायला हवा असतो. ही सोय म्हणजे आपलं आयुष्य पुन्हा एकदा जगण्याची मस्त गंम्मत आहे. तोच जन्म आपण पुन्हा जगण्याची गंम्मत, ही असते या ज्युकबॉक्सची.

© विशाल लोणारी, २०१९

विचारधारा ४

कुठलीही गोष्ट उगाच आकड्यांत मोजायची आपण सवय लावून ठेवली आहे. त्यात भावनाही आलीच. हा खेळ आकड्यांचा खेळताना कोणतेही ठोकताळे वापरून आपल्या डोक्यात येईल त्याप्रमाणे भावनांचीही गणती करू सुटलोत. कशासाठी. कुणी ठरवले हे. हे ठरवताना कोणत्या बाबींचा विचार करण्यात आला. आपण येथे विचार करताना सर्वांना हवीहवीशी (किमान चर्चेला तरी) प्रेमभावनेचा विचार करू. किती भयंकर पद्धतीने आकड्यांचा ससेमिरा आपण या भावनेच्यामागे लावून ठेवला आहे. पहिलं, दुसरं, तिसरं, खरं काय आणि खोटंही, म्हणजे खऱ्य-खोट्यालाही लोकांनी क्रमांक देत मोजण्यास सुरूवात केली हो. हे अगदीच न समजण्यासारखे नाही का .. सुंदर नाजूक कोमल भावना, मनाला लूभावणाऱ्या गोष्टी बघताच त्या फुलून येतात, त्या भावना जागवणाऱ्या ग्रंथी स्त्रवतात अन त्या रसायनांमधून मेंदुला आपल्याला प्रेम झाल्याचे आदेश मिळतात. मग, त्याचे कॅलक्युलेशन करण्याची गरज कशासाठी अन आली कुठून. म्हणतो मी.

त्यांची गणती व्यवहार्य जगात जगण्यासाठी अत्यंत गरजेचीच आहे. त्याला बंधनेही घातली जातात हे योग्यच. भावनांचे नियंत्रण साकारण्यासाठी ती आवश्यकच. पण अशा भावनांना आकड्यांत अडकवण्याचे कारण ते काय. काहीच नाही. जिथे जिथे आकडे आपलं अस्तित्व मिळवतात, तिथे तिथे म्हणून केवळ मग रूसवे, फुगवे, वाद-विवाद, हेवे-दावे, मानहानी, मारामारी इत्यादीच गोष्टी डोके वर काढतात. अन मग अशा सगळ्या परिस्थितीला तोंड देत बसावे लागते. जन्मभर खूप कमी गोष्टी या आकड्यांमधून चांगल्या बाहेर पडतात. जसे की काही आकडे तुमची प्रगती दाखवतात. त्यामुळे आपण भावनांना आकड्यांत मोजणे बंद केले पाहिजे.

लेख लिहायला सुरूवात केली तेव्हा पण किती शब्दांत लिहावा. हा विचार मनात चुकचुकून जातोच. किती वेळात लिहावा, किती शब्दांत लिहावा, किती लोक वाचतील, त्यातील किती जणांना तो आवडेल, किती जण त्याला वाचणार नाहीत इत्यादी एक ना धड भारंभर चिंध्या सगळ्या टपटप करत सगळीकडे पडायला सुरूवात करतात. याची काही गरज नाहीच. एखादे काम ज्यात आपला बुद्धीचा भाग, भावनांचा प्रवाह जोडले गेला असेल त्यात एवढा जीव एकवटून आकड्यांचा विचार करायची गरज ती काय ..बेलाशक आकडे महत्वाचे असतात, आहेतच. त्याशिवाय माणूस कधी जन्मला, मेला कधी या साध्या गोष्टीही माहिती होण्याची पंचाईत होईल. त्यामुळे अगदीच आकड्यांना नाकारून चालणार नाही. मात्र, भावनांच्याबाबत असा आकडेभाव आणून ठेवता कामा नये. भला मोठा उभा माणूस आकडी आल्यावर आडवा-तिडवा होऊ शकतो. वेड्यासारखा वागू शकतो. मग त्या आकड्यांच्या नादीच कशाला लागायचे म्हणेल मी. फार भन्नाटच खेळ असतो या आकड्यांचा. कोणाच्या आयुष्यात वादळ आणेल तर कुणाच्या आयुष्यात थेट आनंदाचा दरवळच आणून सोडेल. हे सगळे का, कशासाठी. या विचारण्याला काही अर्थ नाही. आकड्यांवर तसा काही विचार करायचाच नसतो. आकडे हे आयुष्यात जगण्यासाठी निव्वळ एक साधन म्हणून वापरले जातात. ते साध्य नसते. साध्य ते असूच शकत नाहीत. कसे असणार आणि का.. आकड्यांचा फार विचार केल्यानेच आपण इतरांसाठी एकतर बदनाम होत जातो. वा, इतके मोठे होतो की मग कुणाच्याही भावनांना चुरडून पुढे जाण्याची उगाच हुक्कीही आपल्याला येऊ लागते. अन, ना म्हणूनच आकड्यांच्या फंद्यात फार अडकून पडायचे नसते. फार त्याकरिता सैरभैर वाहवत जायचे नसते. जे असते, ते सगळंच सोडून द्यायचे असते एक ना एक दिवस, मग आकड्यांचे ओझे तरी का बाळगा.

आता, आकड्यांचा भ्याव, लगाव जर ठेवायचा नसेल, तर ठेवायचा तरी कशाचा हा पण प्रश्न विचार करण्याजोगा आहे. तो कशाचा तरी करावा, घ्यावा लागणारच. मग त्यातून सिद्ध काय करायचे हा पण एक प्रश्न निर्माण होणार. किती अवघडच आहे हे सगळं. एखाद्या गोष्टीने मेंदुला दिले जाणारा ताण सोडायचा म्हणून काय तर त्याऐवजी दुसरी तशीच गोष्ट द्यायची. अन ती द्यायची तर तिच्याभोवतीने अनेकच गोष्टी येणारच ना. मग त्यांचा वेगळी शक्ती एका वेगळ्या आवेगाने सभोवती फिरणार, मग त्या शक्तीचे आपल्याभोवती फिरणेही उगाच मोजावे लागणार. मग, ते मोजणे पुन्हा काय आकड्यांतच गणायचे. बरं गणले तरी ते नुसतेच थोडे गणले जाणार, उगाच त्याभोवती भावनांचे जाळ्यांना विणले जाणारच. हे सुटणार तर नाही. म्हणजे आकड्यांशी असणारे नातेबंध काही सुटणार-तुटणारे नाही. मग किमान त्यांच्यामुळे शेकडोंनी भावनुसंबणे तरी थांबवायला हवे. विचित्र, घटनांतकृती यामुळे घडते, सहजासहजी घडली तरी दीर्घ परिणामकारक अशी ती ठरते. त्यामुळे आकड्यांना भावनांशी होणारी जोडणी अन त्यातून निघणारी व्युत्पत्ती तात्काळ थांबवायला हवीये. आज आत्ता ताबडतोब बक्षिस मिळवण्याच्या कार्यक्रमामुळे जशी आकडेवारी वाढत जात होती, तशी लोकांच्यासाठीची धाकधुकी वाढली, याला कारणच आकड्यांचे भावनांशी जुळणे हे होते. जे नकोय, त्रास होत जातो. म्हणून. ..

३ री विचारधारा

खूप काही लिहिल्यानंतर, सतत लिहिल्यानंतर दमायला होते. मेंदुवर बऱ्यापैकी ताण येतो. त्याला आपसूकच आरामाची गरज भासते. हा ताण अनेक प्रकारे माणसांना छळतो. मानसिक आरोग्याला आजारी पाडतो. काहीही करण्याची इच्छा बळावत नाही. अन, लेखकाला इच्छा बळावत नसेल तर तो लिहिण्याचे कष्ट उचलत नसतो. काही वाचक जसे पुस्तक पहिल्याच बैठकीत वाचून संपवावे तसे काही लेखकही असतात, डेडलाईन कोणी देण्याची गरजच नसते. ते स्वतःच एक डेडलाईन स्वभोवती आखून घेतात. यामुळे त्यांचे लेखन ठराविक काळातच पूर्ण केले जाते. तर, काही लेखक मात्र, अत्यंत आळशी प्रकारात मोडतात. उगाच काहीही म्हणून ते कधीच मेंदुच्या तारांना छेडत बसत नाहीत. उलट एखादा मसालेदार मेदुवडा खावून त्या मेंदुच्या तारांना गुंडाळा देऊन ते अक्षरक्षः झोपी जातील हो. माझे एक शिक्षकही तसेच आहेत. ते त्या काळी म्हणजे माझी पिढी चिलींपिली होती तेव्हा वृत्तपत्रांतून लेखन करायचे. आम्ही ते तंगड्या उलट्या करून वाचायचो. पुढे कालांतराने तेच आम्हाला लेखनाचे धडे द्यायला आल्यावर त्यांनी हे लेखनही भिंतीवर दोन पाय लावून खाली बिछान्यावर झोपून लिहिल्याचे सांगितले. मी ही आता, आता असा आडवातिडवा पडूनही लिहू शकलो. नाहीतर आधी डेस्कटॉपच्या काळात टेबलावर बसून लिहिण्यावाचून पर्यायच कुठे होता. आता मोबाईलने हे काम सोपं करून ठेवले आहे. तर काही लेखक मात्र याच्या अगदी विरूद्ध वागणारे ठरताता. टेबल,खुर्चीचे डेस्कमध्ये त्यांचा जीव अडकलेला असतो. ते ही योग्यच. लेखकामध्ये शिस्त आणि व्यवस्थितपणा हा हवाच…

लेखनाचा जसा ब्लॉक असतो तसा वाचनाचा पण एक ब्लॉक लागत असतो. त्यादिवशी वाचन डायरेक रद्द करण्यात आलेले असते. मोठमोठ्या कागदांवरही फक्त नजर फिरवली जाते. हा ब्लॉकही जर अतिमहत्वाचे कागद नसतील तर नुसतं चाळणे पण नकोसे वाटते. वाचन तसे प्रत्येकाच्याच आयुष्यात महत्वाचे हो. पण हे म्हणणे झाले सुसंस्कृत, साक्षर असणाऱ्या लोकांचे, शिक्षण नसलेले अनेक जण या वाचनापासून वंचित असतात, असे अनेक लोक, म्हणजे कोट्यावधीने म्हटले तरी अतिशयोक्ती ठरणार नाही इतके हे एकूणच समाजव्यवस्थेत स्वतःचे स्थान निर्माण करू न शकलेले आहेत. पण, वाचनाचा ब्लॉकबद्द्ल बोलायचे झाल्यास आपल्याला तूर्त त्यांचा विचार करता येणार नाही. तर, थोडक्यात वाचन करणारा वर्ग हा मध्यमवर्गीय या आर्थिक स्तरापासून सुरू होतो. आपण येथे बोलतोय ते त्यांच्याबद्दलच.

अशा ब्लॉकिंगच्या परिस्थिती वाचक, लेखकाच्या बाबतीत येतातच. कितीही नाही म्हटले तरी सर्जनशील व्यक्तीला हा शाप असतोच. या ब्लॉक काळात स्वतःला समजावणे महाकठीण होऊन बसते. लिहू वाटते सुचत नाही. वाचू वाटते तर ते ही सापडत नाही. मग अशात करायचे तरी काय ? याचे उत्तर कुणी लिहून ठेवलले नसावे. असते तर, किती बरे झाले असते. पण, जशी लिखाणाची, वाचनाची शैली वेगवेगळी आहे. तशीच या अशा ब्लॉकमधून बाहेर पडण्याची पण शैली प्रत्येकाची वेगवेगळा आहे. कुणी या सगळ्या मानसिकतेचा जोमाने सामना करत जातात. कितीही मान मोडावी लागली तरी त्यांचे वाचन अन लेखन हे सुरू असते. अशाने कदाचित त्यांना तात्पुरता शारिरीक थकवा जाणवतो. मात्र, मनाच्या मेंदुच्या सवयी त्यांना तो थकवा विसरायला, त्यापासून मागे पळायला मदत करतात. मग, एकदा त्यांनी त्यांच्या कामात डोकं घातले की पुन्हा वर डोकावून पाहत नाहीत. पण, अनेक जण या समस्येला समस्या म्हणून घेतच नाही. या दोन कामांव्यतिरिक्त अनेक गोष्टी त्यांना करायच्या असतात, ही जमात ते करत बसते. या त्यांच्या सवयीमुळे त्यांनी अनेक गोष्टी अर्धवटही सोडलेल्या असतात. हो, हो काही तर स्वतःचे लेखनही अर्धवट सोडून देतात. वाचन तर लांबचीच गोष्ट, परिणाम म्हणाल तर, प्रत्येक गोष्टीचे अर्धवट ज्ञान. कुणीतर मस्त कडकडीत झोप मारतात, असे झाले की. मग जे काय सुटतात. त्यांना कितीही अडथळे आले तरी फरक पडत नाही. अशात क्षणभर ते विश्रांती घालतील अन पुन्हा आपल्या कामाला सुरूवातच करतील.

तेव्हा कधीही आयुष्यात असे कामास तापदायक ब्लॉक येणे काही असामान्य गोष्ट नाही. आपल्या कामाचा अतिरिक्त ताण सहन न होणे हे इतकंच साधं आहे. यात हताश होऊन पडून किंवा गळून जाण्यासारखे काही नाही. प्रत्येकच हाडामांसासचा व्यक्ती, माणूस यातून जातो. यात आपल्यापरीने, आवडीने त्या ब्लॉकवर जादूची काडी फिरवावी तसे काम करून काढून टाकायचे असते. असे केल्यानेच पुन्हा स्वतःतील वाचक-लेखक गवसतात. अन जीवन फिरसे खुशःहाल बन जाता है. थोडंसं थांबावं, आयुष्याला वेगळं बघावं अन ते झाले की नवीन कुठला आयुष्याचा अर्थ कळतो. मग, पुन्हा नवा जोश, नवे क्षितिज, नवा सूर्य. हरेक बात नयी अंदाज मै..

विचारधारा २

माणसाला सवयी लागतात…कितीतरी वेगवेगळ्या.. आणि एकदा लागलेल्या सवयी, पटकन सुटत नाहीत. त्यांना आपण सोडवले आहे, असे म्हणतो खरं. हो, जेव्हा प्रचंड कष्टाने आपण लागलेल्या सवयी विसरायचा प्रयत्न करतो. पण, त्या सुटतात का हो.. मला तरी वाटतं त्या सुटत नाही. मग काय होते.. जी सवय आपण सोडवू पाहतो आहोत, ती तर काय सुटायचे नाव घेत नसते. किती आठवायचं नाही ठरवलं तरी आपल्या सवयीची आठवण आपल्याला, हमखास येतेच. जसे की मला, येतेय. प्रश्नार्थक विरामचिन्हाची. किती ठिकाणी त्याची मला गरज होती. पण, तो काय सापडत नाहीये. म्हणजे, जो किबोर्ड आता मी टायपाला वापरत आहे त्यात तो द्यायचा म्हटले, तर सिस्टीमची भाषा बदलावी लागतेय. मग, तो देऊन परत आपला मातृभाषा किबोर्ड वापरायचा, कोणी सांगितलं ना, त्यापेक्षा द्या दोन टिंब, अन चालू द्या. सवयींचे पण असेच काहीसे असते. बघा.

सवयीचे पण असेच असते, सुटली तर सुटली. सुटते म्हणजे पण काय, तर आपल्याला ज्याची सवय आहे ते आपण विसरतो. इतकंच. म्हणूनच मग बर्याचदा जी गोष्ट सोडायची आहे तिला विसरायचं. मग तिला विसरायचं तर, दुसरं काहीतरी त्याजागी हवंच. मग, ते हवं म्हणून नव्या गोष्टींचा अवलंब करायचा. याचा अर्थ काय तर एक सवय सोडायला आपण दुसरीला जवळ केलेले असते. त्यामुळे ती पहिली हळूहळू स्मृतींतून बाद होत जाते. लांब कुठेतरी कोपर्यात मेंदु तिला ठेवून देतो. अडगळीत मग पहिली सवय तशीच पडून राहते. कदाचित कित्येक कित्येक वर्षे. या कित्येक कित्येक वर्षात अनेक गोष्टी घडून जातात. आपली पहिली तर गेलेली असतेच, पण तिच्यापुढे दोन,चार , दहा इतकेही क्रमांकांनी बाजी मारलेली असते. मग, आपण मोठ्या मोठाइकी मारत सांगतो की माझी ही सवय सुटली ती सुटली, पण हे मान्य नाही करत की त्याऐवजी अमुक-तमुक नवीन सवय मला लागली आहे, ते. हे आपण मान्य केले पाहिजे ना

एका सवयीतून दुसरी सवय लागते. त्या लागलेल्या सगळ्या सवयी मेंदुच्या कुपीत बंद होऊन जातात. मग, याच सवयी अधूनमधून आपलं डोकं वर काढतातच आयुष्यात. काढणारच, निसर्गनियमच तो. निसर्ग हाच सगळ्यात मोठी नियती आहे. खरंतर, आपण काय, कसं, केव्हा, कुठे वागतोय याचा बारकाईने विचार केला तर, आपल्या जडल्या सवयी, त्यांनी नव्याने दिसलेले परिणाम, हे जर आपल्या विचारचक्रांत घोघांवू लागले तर, लक्षात येते की हे सगळं किती नैसर्गिकरित्या घडून आलं. पण अमुक एक गोष्ट घडायची होती, म्हणून आपल्याला ही सवय लागली. तेव्हा आपण निसर्गाकडे अचंबित होऊन पाहण्यावाचून काहीच करू शकत नाही. हो, ना..
काय, काय पण ते आपले भ्रम तयार झालेले असतात. मी असा झालो. हे झाले, ते झाले वगैरे वगैरे. मग, पुढे हे असं ना आपणच आपल्याला काहीतरी मोठं समजू लागतो. त्याचीही सवय अंगवळणी पाडून घेतो. आता ती सवय चूक की बरोबर हे पुढे कळून येतेच की.

असंच असतं सवयींचं. लागली म्हणजे काय तर, एखादीच गोष्ट आपण पुन्हा पुन्हा करू लागतो. सुटली म्हणजे काय तर त्या गोष्टीची जागा दुसरी कोणतीतरी गोष्ट घेते. मग हे चक्र वाढतच जाते. गोल-गोल फिरतच राहते. पण, आधी कधीतरी करत असलेली गोष्ट भूतकाळातून पुन्हा उकरून बाहेर निघतेच. पुन्हा समोर येते. यालाच निसर्गनियम म्हणतात. या गोष्टींचे नियमन निसर्ग नियती करत असते. आपल्या हाताने सगळं, घडत असते. पण, आपल्या हातात यातले काही नसते. विश्वास आपल्यालाच आपला बसत नाही की हे सगळं, कसे आणि का घडत आहे. पण, हे जगाच्या चक्रानुसार घडत असते. ऋतूचक्राच्या नियमानुसारही आपल्या सवयी आपोआप बदल घडवून आणतात, आपल्याला त्याबद्दल कुठे काही समज येते. आगम्य,गूढ आयुष्याच्या अनेक गोष्टी या अशा होतात. कळूनच येत नाही कशा ते.
आयुष्यात जे घडतं, त्यामागे नक्कीच काहीतरी योजना दडलेली असते. हे खरंच. तद्शिवाय आपल्याला सवयी अंगवळणी पडणे शक्य नाही. पहिलीच नाही, तर दुसरीही नव्हेच. सवयी या आपल्याला आपण लावून घेतो त्या खूप कमी असतात. पण आपल्या कळत-नकळत लागणार्या सवयीच प्रचंड. म्हणजे, आपलं आयुष्यावर आपलं नियंत्रण नाही. त्यावर सगळं काही नियंत्रण कुणाचं, तर निसर्गाचे. बदलतो आपण, कारण निसर्ग होतो. आपण मात्र गुर्मीत, माझी ही सवय चांगली, अन ती वाईट. निसर्ग कोणती एकच गोष्ट नाही, निसर्ग चराचरांतच आहे. त्यामुळे तो जसा वाकवेल, वागवेल, तसे आपण वागू लागलो आहोत. तशा सवयींचे सुटणे आहे, जडणे आहे.

© विशाल लोणारी, २०१९

विचारधारा

प्रत्येक वेळेस व्यक्ती तितक्या प्रकृती असणे गरजेचे आहे का ? काहीतरी जगात एकसमान असायला नको का.. चार दोन सारख्या स्वभावाची माणसे एकसाथ कुठे आढळून येतच नाहीत. दर दिवशी एकाच व्यक्तीच्या स्वभावाचे अनेक विविध पैलू समोर यायला लागतात. त्यावरून त्या व्यक्तीशी आपल्या वागण्यात बदल करावा लागतो. अनेकदा तो आपोआप होत जातो. पण, हे भयंकर त्रासदायक ठरते. याचे कारण आपला मेंदू. त्याला एखादी गोष्ट जशी समोर आली तो तशी स्वीकारतो. मात्र, तीच गोष्ट,घटना, व्यक्ती काही दिवसातच वेगळ्या ढंगात आणि रंगात दिसायला लागल्यावर, मेंदूचा पुरता गोंधळ उडतो. अर्थात, मेंदुचे कार्यच आहे, सतत अद्ययावत होणे, बदल स्वीकारणे, त्यावर अंमल करणे, यातून त्याला ऊर्जा मिळते. त्यातही ही मेंदुच्या एका भागाला मिळते, भावनीकदृष्ट्या जो भाग मेंदुचा कार्यरत असतो, त्याला मात्र हे आव्हानच ठरते. याचे कारण एखाद्याशी जोडले गेलेल्या भावनांना पुन्हा नव्याने तोडणे, बदलणे हे कठीणच. अन, म्हणूनच हा प्रश्न विचारणे रास्त वाटते, की प्रत्येक वेळी असे असणेच गरजेचे आहे का.. तशी या विषयावर चर्चा होणे ही गोष्ट पण बाष्कळ वाटू शकते, पण चर्चेला विषय अगदीच चांगला आहे. ब्लॉगच्या दृष्टीने तर मला तरी योग्य वाटतो.

किती विचित्र बरं, या लोकांचे वागणे. काल ज्याच्याशी हसून-खेळून होतात, आज त्याला कुणी हिंग लावून पण विचारणार नाही. अशाने समोरची व्यक्ती कुढून जाण्याची शक्यता तयार होत नाही का .. समोरच्या व्यक्तीला या कुटील दुनियादारीला सांभाळता आले नाही तर कुठल्याशा क्षुल्लक निमित्ताने एखादी व्यक्ती वैयक्तीक नुकसान करून घेणार नाही हे कशावरून.. हे त्रास करून घेणे थांबायला हवे, तेवढी ताकद तर लोकांनी कमवायलाच हवी. जगावर आपल्याला नियंत्रण करता येणार नाही. यासाठी म्हणून आपलाच भावनिक निपटारा होवू न देणे अत्यंत आवश्यक आहे. हे आपल्या मन, मेंदू, भावना, स्वभाव पर्यायाने आपले आरोग्य या सगळ्यांशी निगडीत गोष्ट असल्याने हे जमायलाच हवे.

तसं बघायला गेले तर या जगात इतक्या समस्या आहे की त्यापुढे मी वाढलेली प्रश्नांची कढीला उगाच ऊत देत असल्यासारखे वाटेल. पण हे गरजेचे आहे हे मात्र खरं. स्वभावाला औषध नाही असे सारखं ऐकवले जात असते, खरंही आहे ते. स्वभावाला औषध नाही. अहो, पण कोणाच्या.. तर इतरांच्या स्वभावाला औषध नाही. आपण आपल्याला बदलू शकतोच की.. ह थोंड कठीण जाते. पण, जगण्यासाठी करावेच लागते. अन, बदलावेच लागते. त्यात फार काही अवघड नाही. त्याच्याने सुरूवातीला थोडासा त्रास निश्चितच होतो, पण जेव्हा हे जमतंय, बदलणं, मिसळणे, परत मिसळून बाहेर पडणं, अलिप्त राहणं, हे जमतेय असे जेव्हा आपल्याला कळतं, तेव्हा तसंही जगण्याची मजा येऊ लागते. अन आनंद होऊ लागतो. थोडंसं आपल्या चांगल्या स्वभावाच्या दृष्टीने विचार केल्यास कौर्याचे ठरेल, पण ते आवश्यकच आहे. ईतरांनी आपल्याशी कौर्याने वागताना विचार नव्हता केला, मग आपण आपले चांगले करायला कशाला लाजायचे वा घाबरायचे.या वागण्याने आपला आनंद होतोय ना, तितकंच बस्स.. पुष्कळ आहे जगण्यासाठी.

असे वागणे सुरू केल्याने, घडीघडी आपला इगो दुखावला जाण्याचे चान्सेस कमी होऊ लागतात. याचे कारण कुणी चांगले वागावे याची अपेक्षा करणेच आपण सोडून दिलेले असते. त्यामुळे अपेक्षाभंग होण्याचा प्रश्न उद्भवत नाही, त्यामुळे आनंद टिकून राहतो. आनंद टिकून राहणे फार महत्वाचे आहे. जगात सगळ्यांच्यासोबत चालताना त्याचीच नितांत आपल्याला गरज आहे. त्यावर शरिरातील रक्ताभिसरण अवलंबून आहे. चांगला श्वास हे काम करतो. चांगला श्वास म्हणजे आनंदी श्वास, म्हणून आनंद आयुष्यात अगदी महत्वाचा.

आयुष्य कमीत कमी गोष्टींचा भरणा केलेलं हवं. पण त्यात संधी खूप असाव्यात. काय ना, असे असले की जीवनात ताणतणाव कमी असतो. उणे-पुरे काही फार नको असते. खूप नाती जोडायची असतात, खूप वेळही जगण्याला हवा असतो. अन म्हणूनच हा एक छानसा बदल आपण केला पाहिजे. की कोणताही बदल आपल्याला पटकन करता आला पाहिजेच. अर्थपूर्ण असे नाती आणि माणसांची सुंदर गुंफण आपल्याभोवती विणता यायला हवी अन, म्हणूनच हा स्वभावाचा डाएट करता यायला हवा. नाकारणार्याला नाकारा, स्वीकारणार्याला स्वीकारा. ठोकरणार्याला ठोकरून द्या, हात देणार्याला ऊचलून घ्या. राबवून घेणार्याकडून राबण्याचे मोल वसूल करा. जसे जग वागते तसा बदल घडवून आणा तरच जगण्याची गम्मत आहे, मजा आहे. जगणे तेव्हा सजा होणार नाही. खरी श्रीमंती आयुष्याची भोगता येइल.

आता, अजून किती वाचायचं आहे, उठा आणि कामाला सुरूवात तर करा …

© विशाल लोणारी, २०१९

अधिक लेख वाचा येथे